सोमाटणे – सगे सोयरे हा शब्द लहान नाही. त्याचे महत्व समजून घ्या, असे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले.
ते सोमाटणे येथे ठेवलेल्या सत्काराच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. यावेळी बापूसाहेब भेगडे, संतोष मुऱ्हे, शैलेश मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, राजेश मुऱ्हे, अक्षय मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
जरांगे पाटील म्हणाले की, सगे सोयरे हा शब्द इतका महत्वाचा आहे कारण या शब्दाची दहशत विरोधकात मोठ्या प्रमाणावर आहे. ते आपल्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. आपण ज्या मागण्या सरकारपुढे केल्या होत्या, त्या त्यांनी मान्य केल्या आहेत .५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र द्या. त्यानंतर सगे सोयरे यांना पण प्रमाणपत्र द्या.
बऱ्याच कायदे तज्ञांनी विचार मंथन करून सगे सोयरे या शब्दाचा स्वीकार केला आहे. आपल्याआंदोलनाला काही लोक म्हणतात मराठे पुन्हा तहात हारले. आरे मराठे तहात जिंकले आणि लढाईत पण जिंकले आहेत, हे येणारा काळ ठरवेल. जर शासनाने यात काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर १० फेब्रुवारी पासून पुन्हा मैदानात उपोषणास बसेल, असा इशाराही यावेळी जरांगे यांनी शासनास दिला. शासनाचे कारभारी मधेच आपली भाषा बदलत आहेत परंतु दिलेल्या शब्दाला त्याना जागावच लागेल. जर येत्या अधिवेशनात अधिसूचनेच कायद्यात रुपांतर झाले नाही तर शासनाला मोठ्या संघर्षाला समोर जाव लागेल. परंतु आपले मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे आहेत.
भूजबळांवरही केली टीका
भूजबळांनी त्यांच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी बैठका घेतल्या. परंतु काही नेते काही बैठक संपेपर्यंत घरी निघून गेले. इतका तर विश्वास संपादन केला आहे तुम्ही तुमच्याच बांधवांचा. जर माझ्या मराठा बांधवांच्या वाटेत याल तर याद राखा. संपूर्ण मंडळ आयोगालाच आव्हान देईल, आज पर्यत सर्वात जास्त नुकसान मराठा समजाच नुकसान मराठा नेत्यांनीच केले आहे. परंतु ही लढाई आता सामान्य माणसांची झाली आहे.