हिंजवडी, दि. 18 – हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात विनापरवाना फटाका स्टॉलधारकांचे पेव फुटले आहे. हिंजवडी परिसर म्हटले की उच्चशिक्षित आणि हाय प्रोफायल नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. परंतु याच आयटीनगरीतील नागरिक मात्र नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. आयटीनगरीतील एकही फटाका स्टॉल परवानगी घेऊन उभारलेला नाही. त्याबाबत पोलिसांची भूमिका देखील संदिग्ध दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
हिंजवडीत विनापरवाना स्टॉलधारकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रवेशद्वारच बंद केले आहे. त्यामुळे शासकीय इमारतीत ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले आहेत. परिणामी कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांवर मागील बाजूंनी अन्य प्रवेशद्वारातून ये-जा करण्याची नामुष्की आली आहे.
प्रशासनासह ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांचा व स्थानिक नेत्यांचा या स्टॉलधारकांना वरदहस्त असल्याने त्यांच्या विरोधात कुणी “ब्र’शब्द काढायला तयार नाही. हिंजवडी चौक, माण चौक, लक्ष्मी चौक मारुंजीतील मुख्य रस्त्यांवर एकाला लागून एक असे अनेक फटाका स्टॉल राजरोसपणे उभारण्यात आले आहेत. फटाका हा मोठा स्फोटक व ज्वलनशील पदार्थ असल्याने ऐन सणासुदीला एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत.
हिंजवडी ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणत्याही फटाका स्टॉलला परवानगी दिलेली नाही. सरपंचांनी त्याबाबत प्रवेशद्वारावर स्टॉल उभारू नयेत म्हणून त्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, रात्रीच्या वेळी हे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
– तुळशीराम रायकर, ग्रामविकास अधिकारी, हिंजवडी.
परवाना दाखवा अथवा कारवाईला सामोरे जा
फटाका स्टॉलला परवानगी देण्याचे अधिकार हेड क्वार्टरला आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या फटाका दुकानांना ग्रामपंचायत व अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. परंतु अनेकजण केवळ अर्ज करतात आणि विनापरवाना स्टॉल उभारतात. विनापरवाना उभारलेल्या या सर्व फटाका स्टॉलधारकांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. परवाना दाखवा अथवा कारवाईला सामोरे जा, अशी भूमिका पोलीस प्रशासन घेणार असल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले.
पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा
विनापरवाना सुरू असलेल्या फटाका विक्रेत्यांना स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या मूक संमतीनेच रातोरात हे स्टॉल्स उभारण्यात येतात. या बदल्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी प्रकाशमान व गोड होते, असा आरोपही नागरिकांमधून
होत आहे.