मुंबई – शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. दोन्ही गटांकडून सध्या जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होताना दिसत आहे. ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार होत आहे.
दरम्यान, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं तसेच, उद्धव ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधल्याचे दिसून आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे तेच टोमणे तीच कॅसेट असून, त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलायला सांगा. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी देखील गद्दारी केली असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.
तसेच, आम्ही शिवसेना गाळातून बाहेर काढण्याचं काम केलं असून, गहाण ठेवलेला धनुष्यबाण आणि पक्ष आम्ही सोडवला आहे. गेल्यावर्षी २० जूनला आम्ही गद्दारी केली नसून, क्रांती केली आहे. सर्व आरोपांना आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. मुख्यमंत्री होण्यामागे माझी मेहनत आहे. असं देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री साह्यता निधीचे अडीच वर्षात दोन कोटी वाटले होते. या पठ्ठ्याने एका वर्षात ७५ कोटी वाटले. अरे त्याचा जीव वाचवा. एका मुलाचे दोन्ही पाय गेले होते. एक हात गेला होता. त्याला मदत मिळाली नव्हती. व्हीलचेअरवर त्याचा बाप घेऊन आला होता. पाच लाख लिहिले आणि धनादेश दिला. असे काही प्रसंग एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
“काय मिळवलं आम्ही ही काय चूक केली, ही माझी चूक आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा बाळासाहेब, दिघेसाहेब आपल्या सर्वांचा आधार यामुळं हा एकनाथ शिंदे तुमच्यासमोर उभा आहे” असंही यावेळी शिंदे म्हणाले.