मुंबई – विधीमंडळात काल घडलेली घटना लाजीरवाणी होती. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी होती. विधीमंडळातील कामाचा दर्जा खालावत चाललेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या भावनांना वाट करून दिली.
ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो, तिथे मी तुम्हाला पाठवतो आहे, अशी जनतेची लोप्रतिनिधींकडून अपेक्षा असते. मात्र तिथे काल जे काही दृश्य पाहायला मिळाले, ते खरोखर शरमेने मान खाली जावी असे होते आणि जबाबदार पक्षाकडून हे घडले. हे आम्ही घडवलेले नव्हते.
वेडंवाकडं वागायचं आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही
आम्ही मराठा समाजाबद्दल, ओबीसी समाजाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल ठराव केला. तुमची असहमती व्यक्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्याला लोकाशाही म्हणतात. पण वेडवाकडं वागायचं आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही.
काल जे आपल्या सगळ्यांच्या समोर घडलं, ते तर समोर आलेले आहे. पण त्याच्यानंतर भास्कर जाधव यांच्यासोबत जे दालनात घडले त्यातले बरचसे वर्णन त्यांनी केलं, संपूर्ण वर्णन केलेले नाही. ते ऐकल्यानंतर अक्षरश: शिसारी बसावी, असे हे वर्तन महाराष्ट्रात घडू शकते यावर माझा काय कुणाचाच विश्वास बसणार नाही. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.