मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज काही तरी नवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता फडणवीसांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी,”महाराष्ट्रात २१ जून २०२२ ही तारीख कुणालाही विसरता येणार नाही. कारण याच दिवशी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बाहेर पडले. आधी ते सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटीला. एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे बंड सर्वात मोठं ठरलं आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला एक ऑफर दिली होती. त्या ऑफरला आपण नकार दिला” असा खळबळजनक दावा केला आहे.
पुढे बोलताना फडणवीस यांनी,“एकनाथ शिंदे हे जेव्हा सुरतला निघाले होते त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता. त्यानंतरही केला होता. मला तर त्यांनी इथपर्यंत सांगितलं की जे काही झालं ते झालं आता हे सगळं थांबवा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा.मी त्यावेळी त्यांना उत्तर दिलं की आता ती वेळ निघून गेली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्यांना आम्ही तोंडघशी पाडणार नाही. हे माझ्या आणि माझ्या पक्षाच्या धोरणात बसत नाही. “असे उत्तर दिल्याचे म्हटले आहे.
आता उद्धव ठाकरेंशी हात मिळवणीची वेळ निघून गेली. मी बदला वगैरे म्हटलं होतं. संजय राऊत म्हणाले की आता एक व्हायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं पण आता ते शक्यच नाही. मात्र एक सांगतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. आम्ही सोबत चहा सोबत पिऊ शकतो. पण आता त्यांच्यसोबत जाऊ ही वेळच आता निघून गेली आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात होते तेव्हा त्यांना अडवणारे एकनाथ शिंदे होते. मला तेव्हा एकनाथ शिंदेंनी अस्वस्थ होऊन फोन केला होता की तुम्ही एकदा मातोश्रीवर येऊन जा सगळा विषय संपेल. मात्र एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले होते. तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीण होतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे.