मुंबई – महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप होतोयत. विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार लक्ष्य करण्यात येत असून ते मंत्रालायत येत नसल्याचं सांगत, टीका केली जाते. मात्र योगगुरू रामदेव बाबा यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर स्तुतीसुमणे उधळली आहेत.
महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे रत्नागिरीत प्रात:कालीन योग शिबिर व प्रांतिक महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी रामदेव बाबा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्यामुळे भाग्योदय होत आहे. केंद्रात चांगले काम सुरु असल्याने देशाच्या विकासासाठी सर्वांचे नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उदय सामंत राष्ट्र निष्ठा व योग निष्ठा प्रेमी असल्याचे सांगून त्यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत यांनाही आपणासंबंधी आनंद, प्रेम असल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.
पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील. केजरीवाल यांनाही चांगल्या कामाची पावती मिळेल असही रामदेवबाबा यांनी म्हटलं.