मुंबई – राज्याच्या राजकारणात कधी नव्हे ती अशी अस्वस्थता आहे. सरकार कोसणार अशा बातम्या येत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने कसलीही तमा न बाळगता कामाचा धडाका सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र ही मागणी मान्य होत नव्हती. आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य करत नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास होकार दिल्याचा दावा कऱण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ऐन पावसात हजारो आंदोलकांनी नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. उर्फ दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली होती. त्यासाठी मानवी साखळी तयार केली होती.
दरम्यान दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. मात्र आज शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिबा यांच्या नावाला होकार दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.