मुंबई – उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजनाम असल्याचे विसरले असल्याचे दिसून येत आहे. बाबरी मशीदीत मूर्ती ठेवणं आणि मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. जर मुख्यमंत्री गुन्हेगारी कृत्य स्वीकरत असतील तर हे दुर्दैवी आहे, असे म्हणत समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल(बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचा देखील त्यांनी सभागृहात पुनरुच्चार केला होता. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला.
अबू आझमी म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सांगावे वाटत आहे की, हे सरकार किमान सामायीक कार्यक्रमावर बनलेले आहे. मात्र येथे मंदिर व मशीदींवर चर्चा होत आहे. तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने पुढे जाणार यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. असे सांगून त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकप्रकारे इशारा दिला आहे. तसेच मुस्लीम मंत्र्यांनी जरा लाज बाळगावी व राजीनाम द्यावा, असे देखील आझमी यांनी म्हटल आहे.