मुंबई, दि. 9 – 2016 मधील नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घासलेले, संपलेले नाणे झाले आहे. हेच कारण होते म्हणून 2019 च्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने युती करण्यासाठी माझ्यासाठी संपर्क साधला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याशिवाय त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय नाही याची त्यांना कल्पना होती. त्यामुळेच ते आता आपली ओळख मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि शिवसेना हे नावही न वापरण्याचे आदेश काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या संवादात त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केले. आपला आता शेवटचा मोठा लढा सुरू असल्याचे नमूद करत आपल्याला भारतीय जनता पार्टीविरुध्द जिंकावे लागेल असे ते म्हणाले. अगोदरही माझ्या स्वत:च्या भावासह (राज ठाकरे) आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काही विश्वासू लोकांनी आपल्याशी विश्वासघात केला. मात्र आपण त्या सगळ्यांचा पराभव केला. आताही आपण त्यांचा (भारतीय जनता पार्टी) पराभव केला तर महाराष्ट्रात कोणीही आपल्या पुढे उभे राहणार नाही असे सांगत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवे चैतन्य फुलवण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत गेले आहेत. आता पक्षाचे चिन्हही निवडणूक आयोगाने तात्पुरते का असेन गोठवले आहे. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासाठी दोन्ही गटांना मनाई केली आहे. अशा स्थितीत जे काही आपल्या हातात आहे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत जी शिवसेना रुजवली आहे तो शिवसेनेचा आधार आपल्यासोबत आहे ना याची चाचपणी आता उद्धव यांच्याकडून केली जात आहे. त्यातूनच त्यांनी आपल्याला निखाऱ्यावरून वाटचाल करावी लागणार आहे असे सांगतानाच आता थेट भारतीय जनता पार्टी आणि त्यातही या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्यावरच आता तोफ डागली आहे.