नवी दिल्ली :– माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात. पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली तरी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
नवी दिल्ली येथे ते पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी गेले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती केली तरीही आम्ही निवडणूक जिंकण्यास सज्ज आहोत. महाविकास आघाडीच्या रुपाने आमचे विरोधक यापूर्वीच एकत्र आहेत. तरीही आम्ही राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही. शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागासवर्गीयांच्या मतांवर कोणाची मालकी नाही
मागासवर्गीयांची किंवा आदिवासींच्या मतांवर कोणाची मालकी नाही. कोण काम करते हे पाहून लोक मतदान करतात. लोक शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करून संविधानाचे रक्षण करत आहेत, हे लोक पाहतात, असेही ते म्हणाले.