मुंबई :– कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाटील आणि देसाई यांना दिले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही भागांवर दावा केल्यानंतर वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा दौरा रद्द झाल्याचे समजते. यावरून संजय राऊत यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. हतबल, लाचार लोकं असून, काही करू शकत नाहीत. फक्त बोलतात आणि आम्हाला शिव्या घालतात. त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावाने बोंबला. शिवरायांचा इतिहास आणि बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला संरक्षण असून, जायला हवे. मात्र, मुळमुळीत धोरणं असलेले हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
बोम्मई यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाबद्दल वक्तव्य करून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यांच्याविषयी हे भूमिकाच घेऊ शकत नाहीत. “अरे’ला “कारे’ म्हणतात, पण प्रत्यक्षात वेळ येते, तेव्हा शेपटी आत घालतात. ही शेपटी असलेली माणसे आहेत, अशा शब्दांत त्यीांन शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे.