सातारा – सध्या राजकारणात बिर्याणीपेक्षा मिसळीचीच चर्चा आहे. साताऱ्याच्या मिसळीचा झटका अनेकांना लागला आहे. आता साताऱ्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी एकत्र मिसळ खाऊन तृप्तीचे ढेकर दिले.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी हॉटेल चंद्रविलासमध्ये एकत्र मिसळीचा आस्वाद घेतला होता. त्याची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा झाली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजेंनी टीका केली होती.
कोणी कोणासोबत मिसळीवर ताव मारला, ते मी लक्षात ठेवले आहे, असा डायलॉग मारला होता. आता त्यांनीच शिवेंद्रराजेंसोबत मिसळीवर ताव मारल्याने मिसळ तीच, फक्त रस्सा बदलला आहे, अशी चर्चा आहे. निवडणूक प्रचाराच्या नियोजन बैठकीसाठी सातारा शहरातील एका महाविद्यालयाच्या कार्यालयात उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे बुधवारी एकत्र आले होते.
बैठकीत चर्चा झाल्यावर शिवेंद्रसिंहराजेंच्या आवडीची मिसळ आणि पाव मागविण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. त्यानंतर दोघांनीही मिसळ-पावावर ताव मारला. जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, पत्रकार विनोद कुलकर्णी, अजित जगताप, राहुल माने, बाळासाहेब ढेकणे, युनूस झेंडे, गायकवाड हे यावेळी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांना साताऱ्यात प्रथमच एकत्र मिसळ खाताना पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांना क्षणभर सुरुची राड्याची आठवण झाली. त्याचा आता विसर पडला असून सर्व जण एकदिलाने प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत.