मुंबई : शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. छत्रपतींच्या जमिनी विकण्याची परवानगी भाजप देणार असल्यामुळे भोसले यांनी भाजप प्रवेश केला आहे. परंतू, उदयनराजे यांचा जमिनी विकण्याचा प्रयत्न भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हाणून पाडेल असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता नवाब मलिक यांनी उदयनराजेंवर गंभीर आरोप केला आहे. शिवाजी महाराजांचा वारसा अबाधित राहिला पाहिजे, त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही, जर कोणी तसा प्रयत्न केला तर आम्ही जनतेला सोबत घेवून त्याचा कडाडून विरोध करू असेही मलिक यांनी यावेळी म्हटले. तसेच सातारा किंवा अन्य संस्थानातील जमिनी विकता किंवा स्वत:च्या फायद्यासाठी कायदेशीर पद्धतीने वापरता येत नाही, दरम्यान, भाजपने राजे आणि इतर संस्थानिकांना जमिनी विकण्याचे आमिष दाखवून भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही मलिक यांनी यावेळी म्हटले.