सातारा (प्रतिनिधी) – राज्य शासनात असलेल्या आमदारांनी मराठा आरक्षणावर काय केले, याचे उत्तर द्यावे. आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी. तुम्ही काय केले, हे एकदा लोकांना कळू द्या, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली सातारा येथे जलमंदिर पॅलेस या आपल्या निवासस्थानी उदयनराजेंनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टोलेबाजी केली.
ते म्हणाले, आरक्षण ठेवायचं असेल तर ठेवा ना! आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये ठेवा. तेथे कोण जाते, एक तर मराठा, रजपूत, शिख देशाच्या सीमेवर असतात. हे सगळे म्हणाले की, राहू द्या, आपल्या कुटुंबांवर अन्याय होत आहे आणि त्यांनी सीमा सोडली, तर काय होईल? सगळ्या गोष्टी पैशांवर अंवलबून नसतात. बेकारी वाढेल, तशा या गोष्टी होत राहणार. आता मराठा आरक्षणावर केवळ रक्तपात होण्याची शक्यता आहे.
मी विष पिणार असे म्हटले नाही, तर त्या पलीकडची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मराठा कुटुंबात जन्मलो म्हणून नव्हे, तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असे मला वाटते. मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. मग, मराठ्यांना न्याय का नाही? राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलू नये. मराठा आरक्षणावर राज्य शासनाने आतापर्यंत काय मांडणी केली, याची माहिती सर्वांना होऊ दे. त्यासाठी त्यांनी श्वेतपत्रिका काढावी.
आम्ही सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न केला. त्यासाठी बैठक बोलावली, पण ते आले नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी मतदान केले, ते त्यांना जागा दाखवतील. मराठा आरक्षणावर कोणी नेतृत्व करायचे म्हटले की, उदयनराजे यांचे नाव समोर येते. तुम्हाला वाटते का, यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल, असा प्रश्न उदयनराजे यांनी केला.