मुंबई, दि. 11 – नांदेड जिल्ह्यातला करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात उद्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 21 मार्चच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातले आदेश आज जारी केले.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जिल्ह्यातल्या करोना स्थितीचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला होता. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार हे निर्बंध लागू केले गेले आहेत.
नाशिक जिल्ह्यातही करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंचवटी रामकुंड परिसरात पुढचे तीन दिवस संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने बंद राहतील. या काळात संचारबंदीही लागू असेल असे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
जालना जिल्ह्यातही 31 मार्चपर्यंत बार, रेस्टॉरंट, ढाबे, चहाची दुकाने बंद ठेवायचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज जाहीर केला. या काळात लग्न समारंभासाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी असेल, मोर्चे,आंदोलनं,धरणं, सार्वजनिक सभांना बंदी असेल असं त्यांनी स्पष्ट केले आहे.