पिंपरी – महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचना बदलल्याने आरक्षणेही बदलली होती. यामुळे अनेक माजी नगरसेवक, इच्छुक आणि दिग्गजांना लढण्यासाठी प्रभागच न उरल्याने त्यांचा पत्ता कट झाला होता. परंतु सतापालट झाल्यानंतर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व निवडणूक प्रक्रिया थांबवित जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीनच्या प्रभागानुसार ठरवलेली प्रभाग रचना शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली. आता राज्य सरकारने 2017 च्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीनच्या प्रभाग रचनेत पत्ता कट झालेल्या सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता, राज्यातील महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वच महापालिकांमध्ये गेल्या वर्षभरापासून निवडणूक प्रक्रियेची जोरदार तयारी सुरू होती. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अंतिम मतदार याद्या यासह सर्व प्रक्रिया पार पडली होती.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने ओबीसी आरक्षणासह दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून पिंपरी पालिकेची 128 ऐवजी 139 सदस्य संख्या केली होती. ही वाढलेली सदस्य संख्या आणि चुकीच्या पध्दतीने केलेली प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती.
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचाही आरोप करत भाजप नेत्यांनी 2011च्या लोकसंख्येनुसारच महापालिकेतील सदस्य संख्या कायम ठेवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती. त्यामुळे 3 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच 2017 च्या प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.
तीनच्या प्रभाग पद्धतीनुसार भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, मनसे या प्रमुख पक्षासह अनेक मातब्बारांनी महापालिका निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, आरक्षण सोडतीमध्ये अनेक मातब्बारांचे प्रभाग महिलांसाठी अथवा ओबीसीसाठी राखीव झाले होते. त्यामुळे या मातब्बारांचे महापालिका निवडणूक लढण्याचे स्वप्न जवळ-जवळ भंगले होते. त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने तीनची प्रभाग रचना रद्द करून निवडणूक प्रक्रियाच स्थगित केली आहे. तसेच 2017 च्या चारच्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांना मोठा दिलासा मिळाला असून निवडणूक लढण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
चारच्या प्रभागामुळे भाजपमध्ये आनंद
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीनच्या प्रभाग रचनेत शहर राष्ट्रवादीच्या अनेक माजी नगरसेवकांना याचा फायदा होणार असल्याची चर्चा होती. तसेच त्यांच्या मर्जीप्रमाणे काही प्रभाग केल्याचेही म्हटले जात होते. मात्र, आता तीनची प्रभाग रचना रद्द करून चारच्या प्रभाग रचनेनुसार पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुक, माजी नगरसेवकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे, तर जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्यामुळे शहर भाजपातील इच्छुक, माजी नगरसेवकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.