पिंपरी – विरोधात गेल्यास जाणीवपूर्वक, सूडबुद्धीने कारवाई करणे अशा प्रकारचा कारभार सध्या सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला असून याबद्दल बोलायचे नाही. अशा पद्धतीचा हुकूमशाही कारभार पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकाराला जनता कंटाळली असून याचे उत्तर मतदानातून नागरिक भाजपला नक्कीच देतील, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मोशीत नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीचे नियोजन महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केले. याप्रसंगी प्रदेश निरीक्षक डॉ.आशा मिरगे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, उज्वला शेवाळे, पिंपरी चिंचवड निरीक्षक शितल हगवणे, प्रदेश सरचिटणीस रूपाली दाभाडे, माजी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेत्या शमीम पठाण, सुरेखा लांडगे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी नवीन महिलांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.
चव्हाण म्हणाल्या की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मजबूत संघटन देण्याचा पक्का निर्धार केला आहे. प्रभाग तीन की चारचा असा संभ्रम निर्माण केला तरी फारसा फरक पडणार नाही. शहराध्यक्ष कविता आल्हाट म्हणाल्या, शहरातील 46 प्रभागांमध्ये महिला कार्यकारणीच्या माध्यमातून बूथ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक प्रभागात आढावा घेण्यात आला आहे. महिला विंगच्या माध्यमातून काम सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोचवण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये महागाई, बेरोजगारी यामुळे मोठा आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप दाखवून देतील. आगामी पालिका निवडणुकीत शंभर प्लसचा आमचा संकल्प असल्याचेही आल्हाट यांनी नमूद केले.