पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – औंध जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दाेन रुग्णांना येथील कामावर असलेल्या अधिपरिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे रक्तपिशव्यांची अदला – बदली झाली हाेती. या प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर प्राप्त अहवालानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी मंगळवारी (दि. २६ मार्च) प्रीती ठाेकळ आणि शांता मकलूर यांना निलंबित केले आहे.
हा गंभीर प्रकार शनिवारी (दि. २३) घडला हाेता. ज्येष्ठ नागरिक असलेले रुग्ण दत्तू सोनाजी सोनवणे यांना न्यूमाेनिया झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. हिमोग्लोबिन कमी झाल्याने डाॅक्टरांनी सोनवणे यांना रक्त चढवण्याचे उपचार सुचवले हाेते. तसेच, शेजारीच असलेले ज्येष्ठ नागरिक दगडू कांबळे यांनाही रक्त चढवायचे हाेते. साेनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह, तर कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह हाेता. त्यांच्या नावाने रक्ताच्या पिशव्यादेखील आल्या आणि त्याच्यावर नावे बराेबर हाेती.
रक्त चढवण्याची जबाबदारी असलेल्या या दाेन्ही अधिपरिचारिकांनी निष्काळजीपणा करत सोनवणे यांची पिशवी कांबळे यांना, तर कांबळे यांची पिशवी साेनावणे यांना चढवली. त्याची रिअॅक्शन आल्यानंतर दाेन्ही रुग्णांना तत्काळ आयसीयू कक्षात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले. परंतू हा प्रकार गंभीर असल्याने या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिपरिचारिकांकडून झालेली चूक ही गंभीर स्वरूपाचीच आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या दोन्ही रुग्णांना ७२ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. वास्तविक रीअॅक्शन आलीच तर सुरूवातीला अर्ध्या तासात येऊ शकते किंवा २४ तासांनी त्याचा परिणाम दिसून येतो. परंतु या दोघांच्या बाबतीत सुदैवाने तसे दिसून आले नाही. कदाचित त्यांच्यातील चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे ती असू शकेल. तरीही त्यांना एकूण ७२ तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. – डाॅ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक