सातारा, (प्रतिनिधी) – येथील केसरकर पेठ आणि कोडोली (ता. सातारा) येथून दोन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत. नीलेश वसंत गुरव (वय 32, रा. कोडोली) हे मंगळवारी (दि. 27) सायंकाळी 5.45 च्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे पत्नी सुरेखा गुरव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
महिला हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत. परळी (ता. सातारा) येथे भावाकडे जाऊन येते, असे सांगून परवीन रशीद शेख (वय 65, केसरकर पेठे) या घरातून निघून गेल्या. त्या अद्याप परत आलेल्या नाहीत, असे त्यांचा मुलगा जमीर शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. महिला हवालदार सुडके तपास करत आहेत.
कोर्टाच्या आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकासनगर (खेड, ता. सातारा) येथील सुभाष व सुनीता साबळे या दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष व सुनीता साबळे यांचा खेड येथील फ्लॅट जानेवारी महिन्यात न्यायालयाने सील केला होता. या दाम्पत्याने सील तोडून अनाधिकाराने फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी दिग्विजय मोटे यांनी दिली आहे. हवालदार यादव तपास करत आहेत.
खावलीतून मोटारसायकलची चोरी
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – खावली (ता. सातारा) येथील रेश्मा विलास साळुंखे (वय 34) यांच्या घरासमोरून मोटारसायकल विश्वासघाताने नेल्याप्रकरणी नंदू पवार (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदू पवार याने साळुंखे यांच्या घरासमोरून दि. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोटारसायकल नेली. ती त्याने अद्याप परत दिली नसल्याने रेश्मा साळुंखे यांनी तक्रार नोंदवली. महिला पोलीस नाईक कदम तपास करत आहेत.