गुवाहाटी – केंद्र सरकारच्या मालकीची बंद पडलेली हिंदुस्थान पेपर कार्पोरेशन लि ही कंपनी आसाम सरकारने चालवायला घ्यायचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी कंपनीच्या कामगारांना 570 कोटी रूपयांचे पॅकेज द्यायचाही निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री हिंमता विश्वशर्मा यांच्या कार्यालयात कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर संबंधीत करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या केल्या. या बंद पडलेल्या कामगारांना गेले अनेक महिने पगार मिळालेला नाही. आम्ही त्यांना थकित पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ही तडजोडीची चर्चा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती.
त्यात अखेर समझोता झाला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली आहे. हिंदुस्थान पेपर कार्पोरेशनच्या आसामात दोन पेपर मिल आहेत. एक पेपर मिल पंचग्राम येथे असून त्याचे नाव कचर पेपर मिल असे असून ती ऑक्टोबर 2015 पासून बंद आहे. दुसरी पेपर मिल मोरीगाव येथे असून त्याचे नाव नागाव पेपर मिल असे आहे.
ती मार्च 2017 पासून बंद आहे. या दोन्ही पेपरमिलची जागा आसाम सरकार ताब्यात घेणार असून तेथील कामगारांना कंपनीच्या आवारातील जागा सोडण्यास सांगण्यात आले आहे. थकित पगार घेऊन जागा सोडण्यास कामगार तयार झाले आहेत. 900 कामगारांना घरे सोडण्याच्या नोटीसाहीं तातडीने जारी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या बंद पडलेल्या या पेपर मिल आणि तेथील कामगारांचे सुरू असलेले हाल हा एक मोठा चर्चेचा विषय झाला होता.