दुबई -आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील महिन्यात अमिराती व ओमानमध्ये होत आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी किमान 25 हजार प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अमिराती क्रिकेट मंडळ तसेच अमिराती सरकारकडे केली आहे.
अमिराती आणि ओमानमध्ये ही स्पर्धा येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. बीसीसीआय स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून, भारतातील करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे ही स्पर्धा या दोन देशांत आयोजित करण्यात आली आहे.
येथेच सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी शेकडो चाहते स्टेडियममध्ये येत आहेत. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेसाठी किमान 25 हजार चाहत्यांना विश्वकरंडक स्पर्धेतील सर्व सामने व अंतिम लढतही पाहता यावी, अशी अपेक्षा गांगुली यांनी व्यक्तकेली आहे. मात्र, यासाठी अमिराती व ओमान सरकार तसेच त्यांचे क्रिकेट मंडळ यांची मान्यता घ्यावी लागणार आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेसाठी सध्या मैदानाच्या असनक्षमतेच्या केवळ 10 टक्के चाहत्यांना परवानगी दिली गेली आहे. मोठ्या संख्येने चाहत्यांना पारवानगी द्यायची असेल तर त्यांना करोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.