ठाणे – भिवंडी येथे चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर 5 जण गंभीर जखमी आहेत. ही इमारत शांतीनगर पिराणीपाडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इमारतीला शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तडे पडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दल जवानांसह शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात येत असतानाच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 26 वर्षीय सिराज अहमद अन्सारी आणि 22 वर्षीय आखीब यांचा समावेश आहे. तर अब्दुल अजीज सय्यद मुलाणी, जावेद सलीम शेख, नरेंद्र बवाणे (उप स्थानक अधिकारी), देविदास वाघ (फायरमन) हे यामध्ये जखमी आहेत.