नवी दिल्ली – केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून पोषण अभियानासाठी राज्य सरकारे, जिल्हा चमू, पंचायत स्तरावरील चमू आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असलेल्यांचा नवी दिल्ली येथे पोषण अभियान पुरस्कार सोहळा 2018-19 मध्ये गौरव करण्यात आला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, महिला व बालकल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी हे याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आणि चंदीगड, दमण-दीव, दादरा-नगर हवेली यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषक देण्यात आले. पहिल्या स्थानासाठी एक कोटी, दुसऱ्या स्थानासाठी 50 लाख, एकूण सरस कामगिरीसाठी प्रथम पारितोषक दीड कोटी, दुसऱ्या स्थानासाठी 75 लाख, तसेच जिल्हा स्तरावरील 19 जिल्ह्यांचे 53 अधिकारी, पंचायत स्तरावरील 50 अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच चांगली सेवा बजावणाऱ्या 237 अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, महिला निरीक्षक, आशा यांना प्रत्येकी 50 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. एकूण 363 पोषण अभियान पारितोषके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी श्रीमती स्मृती इराणी यांच्या हस्ते “थॅंक्यू अंगणवाडी दिदी’ या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.