जेजुरी – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाची जेजुरीनगरीत सध्या लॉकडाऊनमुळे राज्य रस्ते, मुख्य पेठा, गडकोट, पायरीमार्गावर शुकशुकाट आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. दीड महिन्यांपासून देवदर्शन बंद केल्याने भाविक जेजुरीत आला नाही. सदानंदाचा येळकोट येळकोट -येळकोट जयमल्हार, असा गजर लुप्त झाला आहे.
भंडाऱ्याची उधळण, देवाची गाणी, देवांचा जागर नाही. जागरण -गोंधळाच्या धार्मिक विधी, भोजनावळीमध्ये गजबजलेली ऐतिहासिक चिंचेची बाग, पुजारी बांधवांचे वाडे, निवासस्थानात सन्नाटा आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत 50 ते 60 लाख भाविकांचा ओघ आटला आहे. त्यामुळे जेजुरीनगरीत देवसंस्थान, पूरक व्यावसायिकांना सुमारे दोनशे कोटींची झळ सोसावी लागली आहे. सोन्याची झळाळी प्राप्त झालेल्या नगरीत नीरव शांतता दिसून येत आहे.
मार्च ते जून लग्नसराईचे दिवस असतात. शालेय सुट्ट्या, जत्रा, यात्रांच्या उत्सवांचा हंगाम असल्याने चार महिन्यांत किमान 50 ते 60 लाख भाविक जेजुरीत येऊन देवदर्शन, कुलधर्म, कुलाचार व धार्मिक विधी करतात. या कालावधीत एक भाविक किमान चारशे रुपये खर्च करीत असतो. त्यामुळे 50 लाख भाविकांची एकूण उलाढाल ही दोनशे कोटींच्या घरात जाते. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढी आमदनी व्यावसायिक व शहरवासीयांना होते.
यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्याने जत्रा, यात्रा, उत्सव होणार नाहीत. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचे काय? आदी प्रश्न जेजुरीवासीयांना भेडसावत आहेत. जेजुरीनगरीचा आर्थिक कणाच मोडला आहे. याचे दूरगामी परिणाम पुढील काळात अर्थकारणावर होणार आहेत. ठाणे, रायगड, नाशिक, मुंबईकर भाविक कुटुंबासह सुट्टीच्या काळातच धार्मिक विधी करताना मोठा खर्च करतो. त्यातूनच मोठी आर्थिक उलाढाल होते.
यावर्षी लॉकडाऊनमुळे सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. जेजुरीचे अर्थकारण भाविकांच्या धार्मिक विधींवर चालते.
धर्मकारणातून-अर्थकारण व त्यातून समाजकारण (समाजव्यवस्था) अशी पुरातन परंपरा आहे. सर्व उत्सवात अठरापगड जातीधर्माचे समाजबांधव सहभागी असतात. त्यातूनच एक समाज दुसऱ्या घटकाला जोडला आहे. त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्यावर होणार आहे.
पुजारी-सेवेकरी वर्गावर उपासमारीची वेळ
धार्मिक विधींमध्ये गुरव (पुजारी) वीर, कोळी, घडशी हे चार प्रमुख समाजबांधव येतात. त्यांना जोडलेले इतर अठरा पगड जातीधर्मातील समाजबांधव आणि केवळ भाविकांच्या देवदर्शन-कुलधर्म, कुलाचार, धार्मिक विधी यावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे, घराणी आहेत. दीड महिन्यांपासून त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. मंदिरातील आठवडा काही सेवेकऱ्यांना तीन ते पाच वर्षांतून येतो. दीड महिन्याच्या कालावधीत ज्यांना मंदिरातील सेवेचा हक्क व मान प्राप्त झाला आहे. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनचा फटका या चार प्रमुख समाजबांधवांना बसला आहे. बहुतेक कुटुंबांना शेतजमीनी नाहीत. केवळ भाविकांच्या धार्मिक विधींवर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे लक्षणीय आहेत. भंडारा -खोबरे विक्रेते, उपहारगृहे, लॉजिग, बोर्डिंग, मिठाई दुकाने आदींसह पायरीमार्गावर प्रसादपुडे, पूजेचे साहित्य, हार, फळे, फुले विक्रेते वा तत्सम विक्रेते, सलून दुकाने, जागरण गोंधळ करणारे कलावंत आदी व्यावसायिकांची अवस्था दयनीय झाली आहे.
लग्नसराईचे दिवस, विवाह पार पडल्यानंतर वा त्यानंतर धार्मिक विधीतून उदरनिर्वाह करणाऱ्या पुरोहितवर्गाचीही अवस्था वेगळी नाही. पायरी मार्गावर वाघ्या मुरुळी, लोककलावंत, भिकाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांची अवस्था दयनीय आहे. ऐतिहासिक, धार्मिक, राजधानी आणि पुरातन रूढी, संस्कार, परंपरा जोपासणाऱ्या नगरीचा गावगाडा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. इतिहासामध्ये प्रथमच जेजुरीचे मंदिर बंद राहिले असल्याचे जुने जाणते नागरिक सांगत आहेत. आठवडेकरी- मानकरी यांच्या वतीने खंडेरायाचे दैनंदिन धार्मिक विधी त्रिकाल पूजा, आरती, अभिषेक, नैवेद्य आदी नित्यप्रमाणे होत आहेत.
बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन नाही
बहुजन बांधव व अठरापगड जातींचा पुरातन लोकदेव म्हणून गणले गेलेल्या खंडोबाच्या विविध रूढी परंपरा आहे. विवाह झाल्यानंतर संसाररुपी जीवनाला सुरूवात करण्यापूर्वी हमखास नववधू- वर आपल्या पै पाहुण्यांसह जेजुरीत येऊन देवदर्शन घेतात. जागरण, गोंधळ, तळीभांडार, नैवेद्य, लंगरतोडणे, दिवटी पाजळणे आदी विधी होताना दर्शनासाठी गडाच्या पायऱ्या चढताना वराने वधूला उचलून घेत पाच पायऱ्या चढून देवदर्शन करणे या परंपरेला विशेष महत्व आहे. लग्नसराईच्या हंगामात लग्नाचा पोशाख आणि कपाळी मुंडावळ्या बांधलेले नववधू- वर दररोज शेकडोच्या संख्येने येत असतात.
यावर्षी त्यांच्या वाचून पायरीमार्ग सुनासुना आहे. विविधरंगी कापड, मोरपिसानी सजविलेल्या आणि रणहलगी, सनई, ढोल ताशांच्या गजरात नाचत गात देवाच्या भेटीसाठी राज्याच्या विविध प्रांतांतून दाखल होणाऱ्या शिखरकाठ्या, खांद्यावर घोंगडी, हातात कोटमा घेतलेला तर कधी पेटवलेली दिवटी, मुखात मल्हारीचा गजर करणारा रांगडा मराठमोळा भाविक, कोकणातील मल्हारी भक्त, असे बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन महामारीमुळे यावर्षी झालेच नाही.