परिंचे – लॉकडाऊनमुळे पुणे मार्केट व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने परिंचे परिसरात शेकडो टन कांदा शेतात पडून राहिला आहे. साठेबाज व्यापारी संधीचा फायदा घेत असून मातीमोल किमतीने कांदा खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनच्या किंवा अवकाळीच्या भीतीपोटी शेतकरी येईल, त्या किमतीत कांदा विक्री करीत आहे. करोनामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कर्नाटकच्या बाजारपेठेत कवडीमोल भावाने कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
परिंचे, वीर, हरगुडे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. परिसरात उत्पादित केलेला कांदा बेंगलोर मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला जातो. मात्र, कर्नाटकच्या बाजारपेठेतही कवडीमोल भावाने कांदा विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी पुणे, मुंबई येथील मार्केटमध्ये कांद्याची विक्री करतात. यावर्षी कांद्याचे बाजारभाव गगनाला भिडले होते. कांद्याचा बाजारभाव व मागणी लक्षात घेता हा भाव टिकून राहिल, असे वाटत असताना शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला होता. लॉकडाऊनपूर्वी कांद्याला 20 ते 25 रुपये बाजारभाव होता.
यावर्षी चार पैसे हातात राहतील, अशी भाबडी आस शेतकऱ्यांमध्ये होती. लॉकडाऊनमुळे संकट उभे राहिले आहे. परिणामी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालूवर्षी हवामानातील बदलामुळे कांद्यावर करपा व मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. औषधे व रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही वाढला आहे. उत्पादित केलेला कांदा साठवणूक करण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. तीव्र उन्हाळा व अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
परिंचे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. राज्य शासनाने ठोस भूमिका घेऊन कांदा विक्री करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी केली आहे. साठेबाज व्यापारी मातीमोल किमतीने कांदा खरेदी करीत आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.