कोपरगाव -तालुक्यातील मढी बुद्रुक येथे करोना आजाराचे तीन संशयित रुग्ण आढळले असून, आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना नगर येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मढी येथे तीन व्यक्ती करोना संशयीत आढळून आल्या आहेत. या तीनही व्यक्ती पाथरे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या तीनही व्यक्तींना नगर येथे तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील लक्ष्मीनगर भागातील 60 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला आहे. तसेच शिंगणापूर येथील एका 65 वर्षीय महिलेला सारीची लागण होऊन मृत्यू झाला आहे. या धक्क्यातून कोपरगावकर अद्याप सावरले नसताना आज पुन्हा तीन करोना संशयीत व्यक्ती सापडल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या व्यक्तींच्या स्त्राव तपासणी अहवालाकडे लागल्या आहेत. लक्ष्मीनगर भागातील महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती डॉ. विधाते यांनी दिली.
दरम्यान सरकारी यंत्रणेवर करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेला ताण कमी करण्यासाठी तालुक्यासह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत काम करण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार डॉ. शीतल सोनवणे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. योगेश लांडे, डॉ. विवेक सूर्यवंशी, लॅब टेक्निशिअन नीलेश चौधरी, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. शशिकांत धाडीवाल, डॉ. नितीन झंवर, डॉ. वसीम पठाण हे आपली सेवा देणार आहेत, असेही डॉ. विधाते यांनी सांगितले.
नियम न पाळल्याने रुग्णांत वाढ
पाथरे येथील करोनाबाधित रुग्ण तालुक्यातील मढी बुद्रुक येथे दोन दिवस पाहुण्यांकडे आला होता. या रुग्णाचे वडील देखील बाहेरगावी जाऊन आले होते. त्यामुळे केवळ लॉकडाऊन नियमाचे काटोकोर पालन न केल्याने रुग्ण वाढत असल्याचे पुढे येत आहे.