रेडा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यातील आश्रम शाळेतील शिक्षकांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे आश्रम शाळा चालविणे जिकिरीचे झाले आहे. शासनाने आश्रम शाळेतील शिक्षकांचे वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केली आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी (दि. 20) मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. प्राथमिक, माध्यमिक, आश्रम शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी 2020 पासूनचे वेतन अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे या शिक्षकांना कुटुंब चालविणे जिकिरीचे झाले आहे. दरवर्षी मार्चमध्ये मिळणारे परिपोषण अनुदान अद्याप मिळालेले नाही.
करोनाच्या गंभीर समस्यांमुळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याची जाणीव आहे. मात्र आश्रम शाळेतील मुलांना ज्या दुकानदारांकडून उदारीवर किराणा माल भरला होता. त्यांनी पैशांसाठी फारच तगादा लावला आहे. त्यामुळे आश्रम शाळांचे अनुदान जमा करण्याबाबत पवार साहेब आपण लक्ष घालावे. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन झाले नसल्याने, त्यांच्या कुटुंबावर सध्या उपसमारीची वेळ आली आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने उदरनिर्वाह कसा करायचा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांचे वेतन लवकरात लवकर करावे, अशी मागणी रत्नाकर मखरे यांनी केली आहे.