शिक्रापूर -उसण्या पैशाच्या वादातून वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील 27 वर्षीय मित्राचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने वार केले तसेच गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. 26) घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत.
गणेश जाधव व दत्ता फुलारे (दोघे रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. निलेश बबन भंडारे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली असून ते जखमी झाले आहेत. निलेश भंडारेने गावातील गणेश जाधवला महिन्यापूर्वी एक लाख रुपये उसने दिले होते; मात्र भंडारेला आर्थिक अडचण असल्याने तो पैसे मागत होता.
बुधवारी जाधवने भंडारेला फोन करून थोडे पैसे देतो असे सांगून बोलावून घेतले. त्यावेळी भंडारे कार (एमएच 12 पीझेड 8651) मधून गावातील गावठाण येथे गेला. तिथे जाधव व त्याचा मित्र दत्ता फुलारे हे होते. त्यावेळी दोघे भंडारे याच्या कारमध्ये बसले आणि पुढे चल मित्राच्या घरी पैसे आहेत, तेथे गेल्यावर पैसे देतो असे म्हणून काही अंतर पुढे जाताच फुलारेने मिरची पावडर भंडारेच्या डोळ्यात टाकली.
तेव्हा भंडारे हा कार थांबवून पळून जाऊ लागला असता दोघांनी त्याला पकडून मारहाण केली. तर जाधवने भंडारेचा गळा आवळला आणि फुलारेने चाकू वार केले. त्यामुळे भंडारे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागल्याने शेजारील पोपट शिवले यांनी आवाज देऊन काय चालले म्हटले असताना दोघांनी भंडारेला तिथेच सोडले आणि त्याची कार व मोबाइल घेऊन पळून गेले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता पिंपळे जगताप हद्दीमध्ये आरोपींनी कार सोडून पोबारा केला असल्याचे समोर आले आहे.