पुणे – स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत लोणावळ्याच्या “आयएनएस शिवाजी’ येथील जवानांनी 75 किल्ल्यांवर चढाई केली. जवानांनी एकाच दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या किल्ल्यांवरून राष्ट्रगीत गायले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या 75 तुकड्यांत प्रत्येकी तीन ते चार सदस्य होते. “आयएनएस शिवाजी’वरून किल्ल्यांचे अंतर निश्चित करून या तुकड्यांना रवाना करण्यात आले.
या तुकड्या दि. 2 ऑक्टोबर रोजी किल्ल्यांवर पोहचल्या. त्यानंतर तेथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी 12:30 वाजता सर्व तुकड्यांनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगवर लॉग-इन केले.
तर दुपारी एक वाजता नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तुकड्यांशी जोडले गेले आणि या सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले. यातून राष्ट्रभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहचवण्याचा मानस आहे, असे “आयएनएस शिवाजी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.