कोलकता – देश पातळीवर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचाच घटक असल्याची ग्वाही शनिवारी तृणमूल कॉंग्रेसने दिली. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूलची ती भूमिका अजब-गजब स्वरूपाची ठरली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नुकतीच त्या राज्यात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. ती घडामोड इंडियासाठी जोर का झटका ठरली.
त्या आघाडीपासून तृणमूलने फारकत घेतल्याचे सूचित झाले. मात्र, त्या पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी चमत्कारिक भूमिका मांडली. ममतांनी केवळ लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे नमूद केले. कॉंग्रेसच्या अवास्तव मागण्या आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी यांच्याकडून होणारी टीका यामुळे आम्ही ते पाऊल उचलले.
तृणमूल इंडियाचा भाग नसल्याचे ममतांनी कधीच म्हटलेले नाही. आघाडीला इंडिया हे नाव ममतांनीच सुचवले, असे त्यांनी म्हटले. तृणमूल हा बंगालमध्ये पाळेमुळे असणारा पक्ष आहे. इतर काही राज्यांतही विस्तारण्याचे प्रयत्न त्या पक्षाने केले. पण, त्या प्रयत्नांना कुठले यश मिळालेले नाही.