पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नेमके काय करणार याविषयीचा राजकीय सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. नितीश यांच्या नव्या राजकीय खेळीनंतर विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नव्या भूमिकेत दिसतील. त्यामुळे ते मुख्यमंत्री बनणार की विरोधी पक्षनेते याविषयीच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नितीश पुन्हा भाजपशी मैत्री करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, त्यांनी स्वत: जाहीर भाष्य केलेले नाही. आता ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे राजीनाम्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, यासंदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. नितीश यांनी याआधी अनेकदा तेजस्वी यांच्याकडे सुत्रे सोपवणार असल्याचे संकेत दिले.
राष्ट्रीय राजकारणावर आणि विशेषत: आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते बिहारमधील जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे मानले गेले. त्यामुळे नितीश यांनी दिलेले संकेत खरे ठरल्यास तेजस्वी मुख्यमंत्री बनू शकतात.
मात्र, नितीश यांनी पुन्हा भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्यास राजद आणि कॉंग्रेसला बिहारच्या सत्तेतून बाहेर पडावे लागेल. त्या स्थितीत राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी जाऊ शकते. बिहार कुठल्या राजकीय दिशेने जाणार ते उद्या (रविवार) स्पष्ट होण्याची शक्यता आहे.