कोलकता-पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसमधील कलह संपवण्यासाठी पक्षाच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी बैठक घेतली. त्यामध्ये पक्षांतर्गत कलह संपवण्याच्या उद्देशातून 20 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन करण्याचा तोडगा काढण्यात आला.
तृणमूलमध्ये जुने नेते विरूद्ध तरूण नेते असा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना मानणाऱ्या तरूण नेत्यांच्या गटाकडून एक व्यक्ती, एक पद हे धोरण अवलंबण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
त्यातून तो गट एकापेक्षा अधिक पदे सांभाळणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे मानले जाते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी ती भूमिका धुडकावत पक्षाचे तसे कुठले धोरण नसल्याचा युक्तिवाद सुरू केला आहे. त्यामुळे तृणमूलमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. त्यापार्श्वभूमीवर, ममतांनी मोजक्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली.
त्या बैठकीत कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लवकरच ममता पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नावेही जाहीर करणार आहेत.