राहाता, (प्रतिनिधी) – प्रत्येक आदिवासी बांधवांनी आपल्या घरापासूनच व्यसन, अंधश्रद्धा याला फाटा देत शिक्षणाच्या माध्यमातून व आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधली पाहिजे, असे आवाहन आदिवासी नेते शिवाजीराव गांगुर्डे यांनी केले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी एल्गार महिला मेळावा घेण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ओमेश जपे, सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, शांताराम जपे, सोपानराव पवार , पोलीस पाटील सुरेश वाघमारे, सुदामराव मोरे, दिलीपराव गायकवाड, माधव माळी ,सुरेश पवार, विलास पवार, रोहिदास बर्डे, विलास गायकवाड, लाला मोरे आदी उपस्थित होते.
गांगुर्डे म्हणाले की, आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, त्या माहित नसल्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. हा लाभ आदिवासी कुटुंबांना मिळावा , हाच या एल्गार परिषदेचा मुख्य उद्देश असून आदिवासी विकास मिशन गेल्या काही वर्षापासून सातत्याने राबवत आहोत. बाळासाहेब जपे म्हणाले की, शेती महामंडळाची काही जमिन गावाला लवकरच गावठाण मिळणार आहे.
त्यानंतर ज्यांना जागा नाही त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, विविध योजनांच्या माध्यमातून घरकुले देता येतील, असे सांगितले. सरपंच ओमेश जपे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुदाम मोरे, राजकुमार गडकरी, सुरेश वाघमारे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विलास पवार यांनी केले. आभार दिलीपराव गायकवाड यांनी मानले. मोठ्या संख्येने आदिवासी महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.