संदीप राक्षे
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांचे निरीक्षण, कास पठाराची पर्यटक क्षमता संपलीमाहिती केंद्र उभारण्याची गरज
कासला जाणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी एक माहिती केंद्र उभारावे. पर्यटक प्रथम या केंद्रावर येतील. त्यांना वनस्पतींच्या माहितीबरोबरच पठारावर वर्तन कसे असावे, काय पाहावे, कसे पाहावे, काय करू नये आदींबाबतची माहिती या केंद्रावरुन देण्यात येईल. पठाराच्या उत्पन्नाचा विनियोग इलक्ट्रिकल वाहने, पर्यटकांना सुविधा, पर्यावरण संवर्धन यावर करण्यात यावा. कासच्या दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्यासाठी त्याच्या बियाणांची बॅंक करावी. पठारावर कचरा व्यवस्थापनावर भर द्यावा, अशा सूचनाही डॉ. शेंडे यांनी केल्या. कासच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याला आणखी वाव आहे. वन विभागाने पर्यटकांच्या व्यवस्थापनात सुधारणा कराव्यात. कासच्या व्यवस्थापनात तरूण आणि महिलांचा सहभाग वाढवावा, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
सातारा – कास पठाराच्या धारण क्षमतेइतके पर्यटक दरवर्षी येऊ लागले आहेत. आता ही क्षमता पूर्ण झाल्याने पर्यटकांचे लोंढे थोपवावे लागतील. त्याचबरोबर कासच्या पुष्प वनस्पतींची बीज बॅंक करावी. पठारावर माहिती केंद्राबरोबरच पर्यटकांना शिस्तीचे भान करून देण्याची व्यवस्था आवश्यक आहे, अशी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी ‘प्रभात’शी बोलताना ही माहिती दिली.
पुणे येथील तेर पॉलिसी सेंटरचे डॉ. शेंडे प्रमुख संचालक आहेत. या सेंटरने कास पठाराचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार केले आहे. तसेच प्रत्यक्ष पठाराला भेट देऊन 2018 या वर्षाचा अहवाल तयार केला आहे. पर्यटकांच्या लोंढ्यांचा काय परिणाम पठारावर होतो, याची निरीक्षणे या अहवालात मांडली आहेत. तसेच कास पठाराचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची मतेही हा अहवाल तयार करताना विचारात घेण्यात आली आहेत.
हा अहवाल “युनेस्को’च्या वर्ल्ड हेरिटेज समिती, भारताचे पर्यावरण मंत्रालय तसेच विविध पर्यावरण तज्ज्ञांना पाठवला जातो. तेरे सेंटरने 2018 या वर्षासाठी हा अहवाल तयार केला आहे. डॉ. राजेंद्र शेंडे यांनी सांगितले की, कासला एक रिसर्च सेंटर असावे. त्यामध्ये तरूण अभ्यासकांच्या अनुभवाचा लाभ करुन घेतला पाहिजे. पर्यटकांचा लोंढा खुप वाढतोय. सध्या तो 94 हजारांपर्यंत गेलेला आहे. प्रत्येक जागेची भार सहन करण्याची एक धारण क्षमता असते. ही क्षमता “कास’ला काठोकाठ पूर्ण झाली आहे. यापुढे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचे येणारे लोंढे थोपवण्यासाठी त्यांचे योग्य नियोजन करून सोमवार ते शुक्रवार ती विभागून कसे येतील हे पाहवे लागेल.
पठारावर असलेल्या काही वनस्पतींच्या प्रजाती दहापेक्षा अधिक वेळा पायदळी तुडवल्या गेल्यास त्या वनस्पती नष्ट होतात. तर काही प्रजाती 500 वेळा पायदळी तुडवूनही त्यांना कोणताही धोका पोहचत नाही. पर्यटकांना या वनस्पती ओळखणे कठीण आहे. त्यामुळे वनस्पतीची प्रजाती ओळखण्यापेक्षा कोणतीही वनस्पती पायदळी तुडवली जाणार नाही, याची काळजी घ्यायला लागणार आहे. पठारावर जाणाऱ्या पर्यटकांमध्ये पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जागृती करावी लागेल. अन्यथा पाच वर्षांनंतर “या पठारावर सुंदर फुले येत होती,’ असा इतिहास दुर्दैवाने लिहावा लागेल, अशी भीती डॉ. शेंडे यांनी व्यक्त केली.