शेतकरी पुरता कोलमडला : नुकसानभरपाईची मागणी
सोमेश्वरनगर – बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे येथील मुर्टी, भापकरमळा, चौधरवाडी, रासकरमळा, माळवाडी या भागात हातातोंडाशी आलेल्या बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. तर या अतिपावसामुळे शेतात कांदा पीक उगवलेच नसल्याने आम्ही पुरते कोलमडून गेलो असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
सोमेश्वरनगर परिसरात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. बारामतीच्या जिरायती भागातील ज्वारी, कांदा, चारा पिके व भाजीपाला या पिकांची मोठ्याप्रमाणावर लागवड केलेली होती; परंतु, पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून ही पिके पिवळी पडू जळून गेली आहेत, तर काही जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भरपाई मिळावी यासाठी अनेकांनी नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून फॉर्म भरून दिले आहेत. शासनाने या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा विचार करून भरपाई लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे. करंजे ग्रामपंचायत सदस्य बाळू शिंदे म्हणाले की, सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकते फिरकायचेही बंद झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई लवकर मिळेल का नाही, अशा द्विधामनस्थितीत शेतकरी अडकला असल्याचे त्यांनी नमूद केले.