बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात बसस्थानकाची मागणी
प्रवाशांना होतोय त्रास
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच आपण नवीन महामार्ग बसस्थानक उभारल्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सुद्धा प्रचंड नफाच होणार आहे. नागरिकांची देखील सोय होणार आहे.
सातारा – बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगावासह पंढरपूरकडे जाणाऱ्या बसेस सातत्याने ये-जा करतात. या चौकात प्रवाशांना उभे राहण्यासाठी पिकअप शेड नाही, येथेच जर नवीन बसस्थानक उभारल्यास प्रवाशांची गैरसोय थांबेल, अशी मागणी खेड ग्रामस्थांच्यावतीने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.
साताऱ्याच्या दौऱ्यावर ते आले असताना त्यांना खेड येथील कांतिलाल कांबळे, प्रवीण बोभाटे, रमाकांत साठे, भरत देसाई, नितीन तुपे यांनी निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. त्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा दळणवळणासाठी गजबजलेले ठिकाण असून त्या चौकातून एक राष्ट्रीय महामार्ग व एक राज्यमहामार्ग गेलेला असून त्या ठिकाणी ज्येष्ठ अपंग महिला प्रवासी बहुसंख्येने असतात, तसेच आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साधे पिकअप शेड सुद्धा नाही.
यामुळे नागरिकांची वाताहत होत आहे. या चौकामध्ये कार्यकारी अभियंता वारणा कृष्णा वाठार वसाहत यांच्या नावे त्यांना न लागणारी सरकारी जमिनीपैकी एक ते दीड एकर जागा सहज उपलब्ध होवू शकते. या जागेत सध्या बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. काही मोकळी जागा शिल्लक आहे. या जागेवर बसस्थानक व्हावे अशी मागणी खेड ग्रामस्थांच्यावतीने केली आहे.