अजित पवार यांचे आश्वासन; भाजपाने दिशाभूल केली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न सोडविल्याची केवळ फलकबाजी करत नागरिकांची दिशाभूल सत्ताधाऱ्यांनी केली. शहरातून तीन आमदार निवडून दिल्यास व राज्यात आघाडी सरकार आल्यास केवळ सहा महिन्यांत शहरातील सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याबरोबरच पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना सुतासारखे सरळ करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पिंपळे गुरव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शहरात शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न कायम आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन भाजपाने सत्ता मिळविली. मात्र यातील एकही प्रश्न त्यांनी सोडविला नाही. नागरिकांना नोटीसा देवून भयभीत केले जात आहे. तर साडेबारा टक्क्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री, पालकमंत्री वेगवेगळी विधाने करत आहेत. हा काय प्रकार चाललाय? हेच समजत नाही. नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.