सुरेश डुबल
रिक्षा झाल्या उदंड; स्पर्धा वाढल्याने वडापवाले मुद्यावरून गुद्यावर
कराड – एखाद्या गावाला लवकर पोहचण्यासाठी आधी प्रवाशांना लवकर वडाप मिळत नव्हते. आता काळ बदलला अन् वडापमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रिक्षाचालक एक गठ्ठा पॅसेंजर दिसले की नाक्यावरुनच वळण घेत आहेत, तर काहीजण दुसऱ्या गेटच्या परिसरात जाऊन “पसेंजर’ उचलत आहेत. पॅसेंजरच्या उचला-उचलीमुळे वडाप चालकांमधील अंतर्गत वादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
परमिट रिक्षा अन् प्रायव्हेट रिक्षा चालक हा वडापमधील जुनाच वाद आहे. पण सध्या एका नवीन वादाच्या विषयाला तोंड फुटतंय. कुणाची हद्द कुठपर्यंत हाच तो वादाचा विषय आणि याच विषयातून वडापवाले मुद्यावरून गुद्यावर येऊ लागले आहेत. कराड शहरात ऍपे रिक्षा आणि तीनआसनी रिक्षांची स्वतंत्र गेट आहेत. यांची स्वतंत्र संघटना अन् स्वतंत्र थांबेही आहेत. तीनआसनी रिक्षावाल्यांमध्येही प्रवाशांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
हा वाढता प्रकार लक्षात घेऊन प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्यांवर सध्या रिक्षागेटचे सदस्य लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गेटच्या रस्त्यावर कोण रिक्षावाला प्रवासी भरू लागला तर त्याला अटकाव केला जात आहे. रिक्षा गेटवर दिवसेंदिवस वाहने वाढू लागली आहेत. आम्ही रिक्षा संघटनेचा सदस्य असलेला एक अप्पे रिक्षाचालक दिवसभरात फक्त पाच ते सहा फेऱ्या मारू शकतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्याला डिझेल, गाडीचा मेंटनन्स, चालकाचा पगार आदी खर्च भागवावा लागतो. उरलेली अत्यल्प शिल्लक घेऊन त्याला घरी जावे लागते. अशातच संबंधित गेटपासून काही अंतरावर गेटचे सदस्य नसलेल्या ऍपेरिक्षा चालकांकडून प्रवाशांची पळवापळवी केली जात आहे. सदस्य नसलेले ऍपेरिक्षा चालक गेटकडे जाणाऱ्या मार्गावरच थांबून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवतात. त्यामुळे रिक्षा थांब्यावर नंबर येण्यास विलंब तर लागतच आहे. याशिवाय प्रवाशांची पळवापळवी करणारा रिक्षाचालक कोठेही रिक्षा नंबरला न लावता फिरता व्यवसाय करत आहेत. विशेषत: हे रिक्षाचालक प्रायव्हेट असल्याने परमिटधारक रिक्षाचालकांना याचा फटका बसत आहे.
परमिट अन् प्रायव्हेटचा कलगीतुरा अनेक वर्षापासून रंगतोय. दिवसभर आम्ही नंबरला ताटकळत राहतो आणि प्रायव्हेटवाले बेधडकपणे प्रवाशांची उचलाउचली करतात, असा परमिट धारकांचा आरोप आहे. पॅसेंजर तुझा की माझा याच प्रश्नावरून वडापवाले एकमेकांवर धावून जात आहेत. न्याय मागण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याची पायरीही चढावी लागत आहेत. उपप्रादेशिक परिवहन मार्फत आत्ता परमिटच्या रिक्षाचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने जो तो रिक्षा खरेदी करत आहे. काहीजण स्वतः रिक्षा चालवत आहेत. तर काही ड्रायव्हर बघून आपला साइड बिझनेस करत आहे.
शहरात उदंड रिक्षा झाल्याने आधीपासून या क्षेत्रात असलेल्या रिक्षाचालकांना पूर्वीसारखा व्यवसाय उरलेला नाही. ऍपेरिक्षा व्यावसायिकांमध्ये सुरू असलेल्या या वादावर तोडगा निघणे गरजेचे आहे. हा वाद असाच धुमसत राहिल्यास त्याचा भडका उडण्याची शक्यता आहे.
दोघांच्या वादात ट्रॅफिक जॅम
बसस्थानका जवळील कर्मवीर चौकामध्ये पॅसेंजरची संख्या मोठी असल्याने हे ठिकाण ऍपेरिक्षावाल्यांच्या वादाचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी गेटचे सदस्य व फिरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये वाद होतात. येथे प्रवासी भरणे नियमबाह्य असल्याचा गेटवाल्यांचा दावा आहे. तर गेटवाले अन्याय करीत असल्याची फिरत्या रिक्षावाल्यांची भावना आहे. मात्र या दोघांच्या वादांमध्ये येथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनलेली आहे.