- चालकांचे प्रबोधनही : 12 लाख 44 हजार रुपये दंड वसूल
पिंपरी – वाहनचालकांना ऑनलाइन दंड आकारण्यात येतो. अनेक वाहनचालक दंड भरत नाहीत. यामुळे दंडाच्या थकीत रक्कमेचा आकडा फुगतच चालला आहे. यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या चालकांच्या घरापर्यंत जाऊन समन्स बजावण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
ज्या चालकांवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत अशा एक हजार 146 जणांना वाहतूक पोलिसांनी घरी जाऊन समन्स बजावले. एवढेच नव्हे तर त्यांचे प्रबोधनही केले. अशा वाहन चालकांकडून 12 लाख 44 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहन चालकांना ऑनलाइन दंड आकारण्यात येत होता. त्यामुळे अनेक वाहन चालक दंड भरीत नव्हते. यामुळे दंडाची थकीत रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यातच पाच किंवा त्यापेक्षा अधिक नियमभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांनी घेतला. त्यानुसार अशा वाहन मालकाच्या घरी पोलीस गेले. त्यांनी तुम्ही कितीवेळा आणि कुठे-कुठे नियमभंग केला, याबाबतची माहिती दिली.
एवढेच नव्हे तर नियमभंग केल्यामुळे आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात येत असल्याचे सांगत त्यांचे प्रबोधनही केले. तसेच दंड भरण्याबाबतचे समन्सही बजावले. प्रबोधन आणि समन्स येताच नियमभंग करणाऱ्या एक हजार 146 वाहन चालकांनी रोख किंवा एटीएमद्वारे 12 लाख 44 हजार 100 रुपयांचा दंडही त्वरीत भरला.
वाहतूक पोलिसांच्या आयुक्तालयाच्या हद्दीत दहा डिव्हिजन आहेत. प्रत्येक डिव्हिजनमधील दोन कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दंड वसूलीसाठी कोणालाही जबरदस्ती करण्यात येत नाही. कर्मचारी फक्त समन्स बजावतात. जर दंड भरला नाही तर न्यायालयात खटला पाठविण्यात येणार आहे.
– श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस विभाग