नागपूर : शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं होतं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. सेलिब्रेटींच्या या ट्विटसंदर्भात चौकशीची मागणी काँग्रेसने केली होती. यापैकी सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्विटवरून भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यात असून सध्या १२ लोक रडारवर असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
‘सेलिब्रिटींच्या ट्विट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे. 12 लोकांची ओळख पटली आहे, त्यांची चौकशी होणार आहे’, अशी महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोनातून बरे झाले असून आज त्यांना सुट्टी मिळाली. नागपूरच्या एक खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर 5 फेब्रुवारी पासून उपचार सुरू होता. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशी प्रकरणावरून खुलासा केला आहे. ते पुढे म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे, त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास केला’, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्विट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे टीव्ट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.