पुणे -वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने शहरातील उपनगरांना टॅंकरवर दिवस काढावे लागत आहेत. त्यातच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काढलेल्या तोंडी फतव्यामुळे टॅंकरद्वारे केले जाणारे पाणी वितरण बंद केले जाण्याची स्थिती आहे. त्याचा फटका जवळपास पाच लाख नागरिकांना बसण्याची भीती आहे.
पोलिसांच्या नव्या आदेशानुसार, शहरात केवळ दुपारी 1 ते 4 या तीन तासांतच पाण्याच्या टॅंकरला वाहतुकीसाठी मुभा असेल. त्यानंतर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच टॅंकर सोडता येणार आहे. शहरात पालिकेच्या टॅंकरच्य दिवसाला सुमारे हजार टॅंकर फेऱ्या होतात. त्यामुळे या आदेशानुसार केवळ 10 टक्के म्हणजेच 100 टॅंकरच सोडता येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. यावर आता महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना पत्र पाठविण्यात येणार आहे.
रात्री पाणी असते बंद
महापालिकेकडून सर्व जलकेंद्राच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे सायंकाळी सहानंतर टॅंकर भरणा केंद्र बंद असतात. तर हजार फेऱ्यांसाठी महापालिकेचे 30 ते 40 टॅंकर असून खासगी मालकांचे 200 ते 250 अडीचशे टॅंकर आहेत. त्यामुळे सकाळी 6 पासूनच शहराच्या ज्या भागात पाणी जात नाही, तिथे टॅंकरद्वारे पाणी दिले जाते. त्यामुळे तर सायंकाळी 6 नंतर टॅंकर भरणा केंद्रच बंद असल्याने सर्व शहरात रात्रीच्या वेळी पाणी देता येणार नाही. तर टॅंकर भरणा केंद्रावरून पाणी भरून पाणी देऊन येईपर्यंत अडीच ते तीनच तास होतात. त्यामुळे आपोआपच फेऱ्यांची संख्या कमी होऊन नागरिकांची गैरसोय होणार आहे.
पोलिसांकडून याबाबत अद्याप लेखी आदेश आलेले नाहीत. मात्र, आज सकाळपासून खासगी टॅंकर शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांनी अडविले आहेत. त्यानंतर या टॅंकर मालकांनी महापालिकेस ही बाब कळविली. त्यानंतर आम्ही वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला या बाबत तोंडी आदेश असून टॅंकर केवळ दुपारी 1 ते 4 आणि रात्री 10 नंतरच सोडावेत असे सांगण्यात आले आहे. मात्र, पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने वाहतूक पोलिस आयुक्तांना अवजड वाहनांच्या यादीतून टॅंकर वगळयाची विनंती केली जाणार आहे.
– अनिरूद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मनपा