चिखली- पाटीलनगरकडे जाण्यासाठी देहू-आळंदी रस्त्यावरून एकमेव मार्ग आहे. परंतु या रस्त्यात महावितरणकडून विद्युत रोहीत्र आणि डीपी बॉक्स बसविण्यात आला आहे. पाटीलनगर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकसंख्येच्या तुलनेत आता मोठी भर पडली आहे. त्यामुळे रस्ता रहदारीस अरुंद पडत आहे. त्यात या रस्त्यातच रोहीत्र असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे येथील रोहीत्र हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये चिखली गावाचा समावेश झाल्यापासून चिखली गावठाणासह पाटीलनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुधारण होत आहे. पाटीलनगर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांचे कामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर रहिवासी राहण्यास येत आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीसाठी असलेला घाट देखील याच परिसरात आहे. पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प देखील याच परिसरात होत असल्याने या मार्गावर स्थानिक नागरिकांसह इतर राजकीय, सामाजिक व महापालिका अधिकाऱ्यांचा राबता या मार्गावर मोठ्या प्रमाणावर असतो. परंतु पाटीलनगरकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरुवातीलाच विद्युत रोहीत्र बसविल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पाटीलनगरकडे जाणाऱ्या वाहनांना ये-जा करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच देहू-आळंदी मार्गावर यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पाटीलनगरकडे जाणारा मार्ग चिखलीतील मेन चौकापासून अगदी काही मीटर अंतरावर आहे. या मार्गावर जाणाऱ्या वाहनांना जागा न मिळल्यास देहू-आळंदी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होत असून मुख्य चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चिखली परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे महावितरणने येथील रोहीत्र तात्काळ हटवून हा मार्ग रहदारीस मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी केली आहे.
पाटीलनगरकडे जाणाऱ्या मार्गातच विद्युत रोहीत्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद बनला आहे. येथे चढ-उताराचा मार्ग असल्याने पावसाळ्यात येथे वाहनांना अपघात घडत आहेत. त्यातच पाटीलनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तसेच संतपीठ, जलशुद्धीकरण केंद्र, शाळा, बैलगाडा शर्यतीसाठी घाट आदी. या परिसरात आहे. या परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने येथील विद्युत रोहीत्र काढून रस्ता मोठा करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
– जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते.
पाटीलनगरकडे जाणारा मार्ग डीपी आणि अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. हा रस्ता 12 मीटर मंजूर आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या मार्गातील अतिक्रमण आणि अडथळे दूर करून हा मार्ग तयार करावा. या मार्गावर काही ठिकाणी दोन गाड्या एका वेळेस जाऊ शकत नाहीत. तेथील अडथळे दूर करून स्थानिक नागरिकांना मोबदला द्यावा. तसेच रस्ता रुंदीकरण करावे. त्यामुळे दररोजची होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
– विठ्ठल मोरे, नागरिक.
नागरिकांच्या जीविताला धोका
पिंपरी-चिंचवड शहरात रोहित्राचा स्फोट होऊन अपघात घडले आहेत. भोसरी इंद्रायणीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. पाटीलनगर येथील रस्त्याच्या कडेला महावितरणने रोहीत्र बसविले आहे. परंतु या रोहित्राला संरक्षक अवरण बसविले नाही. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. महावितरणने या रहदारीच्या ठिकाणी बसविलेल्या रोहित्राला संरक्षक अवरण लावणे गरजेचे आहे.