मेडचाल-मलकाजगिरी (तेलंगण) – नव्या संकल्पना, नवोन्मेषी विचार आणि आदर्शवादाला कायम जागण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वायूदलातील जवानांना केले. भारतीय वायू दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 213 कॅडेट्सचे दीक्षांत समारंभातील संयुक्त संचलन तेलंगणातील दुंडिगल इथे वायू दल अकादमीत आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला डबक्याचे रूप येऊ नये तर नदीसारखे प्रवाहीपण आपल्यात राहावे याकरता परंपरा आणि नवोन्मेष यांच्यातील संतुलन अत्यंत आवश्यक आहे. उड्डाणे करताना उंची जरूर गाठावी परंतु पाया जमिनीवर भक्कम ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
संरक्षण दलांच्या परंपरा काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांना महत्त्व द्यावे, असे सांगून आंधळेपणाने परंपरांचे पालन करत राहिल्यास व्यवस्थेमध्ये जडत्व येते, याकडे संरक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. हे टाळण्यासाठी सतत बदलत राहणाऱ्या काळाबरोबर राहण्यासाठी परंपरा आणि नवोन्मेष यांच्यात संतुलन साधले जावे, असा सल्ला त्यांनी दिला.
संचलनाला उपस्थित संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सना प्रेसिडेंट कमिशनही बहाल केले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये 25 महिलांचा समावेश आहे. भारतीय नौदलातील आठ अधिकारी, नऊ भारतीय तट रक्षक आणि मित्र राष्ट्रांमधील दोघांनी उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ‘विंग्ज’ प्रदान करण्यात आले.
पदवीधरांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘स्ट्राईप्स’ देण्याचा कमिशनिंग समारंभ संचलनाचे आकर्षण ठरला. अकादमीच्या कमांडंटमार्फत नवनियुक्त अधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. संचलन समारंभात पिलाटस पीसी-7 एमके II, हॉक व किरण आणि चेतक हेलिकॉप्टर्सच्या प्रदर्शनाचाही समावेश होता.
अकादमीतील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थींना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘आनंदलोक’च्या स्वरांवर स्लो मार्च करून नवनियुक्त अधिकाऱ्यांनी संचनल पूर्ण केले. हवाई प्रदर्शनात सु-30एमकेI, सारंग व सूर्यकिरण पथकांनी शानदार कामगिरी केली.