सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांचा व्यासंगही अफाट आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते जे म्हणाले ते योग्य आहे. मी राजीनामा दिला. पण मागे घेतला नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि तो परत मागे घेतला यावरून निवडणुकीत कोण काय करते? काय नाही हा भाग नाही. पण आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना लगावला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. हे विधान करण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषद उदयनराजेंकडे भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, त्याचा सातारा लोकसभेच्या निवडणुकीत काय परिणाम होईल का? असे विचारण्यात आले होते. त्यावर श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीत कोणाला फटका बसला हे समजले असेल असा टोला शरद पवार यांनी उदयनराजे यांना लगावला होता.
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, मी राजीनामा दिला. पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला. तो का घेतला हे त्यांनाच विचारा. कारण वयाने ते मोठे आहेत. विचारांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचा अनुभव मोठा आहे. वाचन अफाट आहे. ते म्हणाले ते योग्य आहे. पण मी व आमच्या घराण्याला विश्वासघात करण्याची परंपरा नाही. त्यामुळे शेवटी कोण काय करते, काय करत नाही हा भाग वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या कारभाराबाबत केलेल्या टिकेबाबत उदयनराजे म्हणाले, “”काही लोकांना माझे नाव घेतल्याशिवाय दिवसच जात नाहीत. चांगले आहे ते माझे नाव घेतात. त्यामुळे मला किमान दृष्ट तरी लागणार नाही. भाऊसाहेब महाराजांच्या काळापासून त्यांच्याकडे पालिकेची सत्ता होती. मग नगर विकास आघाडीने साताऱ्यासाठी काय केले? सातारा विकास आघाडीने मात्र त्यांच्या वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे काहीच करायचे नाही आणि नुसतीच गरळ ओकायची हे काही योग्य नाही.
कदाचित काम केले नसल्यामुळेच त्यांना टीका करण्याची गरज पडत असावी,” असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना उदयनराजे यांनी लगावला. कर्नाटक विधानसभेच्या निकालाबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक प्रश्नांबाबत असणारे मतदारांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात. त्याचाही हा परिणाम असू शकतो. काही गोष्टी खिलाडूपणे घेतल्या पाहिजेत. खासदार संजय राऊत यांच्या काही वादग्रस्त विधानांबाबत ते म्हणाले, खासदार राऊत हे सर्व पक्षांच्या संदर्भात बोलत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी ठरवून त्यांना सामूहिक प्रवक्तेपद द्यावे अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.