सातारा – कौटुंबिक हिंसाचार थांबवून सुखी कुटुंब व्हावे यासाठी योगदान दिले. आधुनिकतेचे वैशिष्टय हे की जबाबदारी घेऊन काम करणे हेच काम कर्मवीर परगावी गेल्यावर त्या करीत असत. 1930 च्या कामेरीच्या जंगल सत्याग्रहात जाऊ नका, सर्व जाती धर्माची मुलं तुम्ही आणली आहेत त्यांच्या शिक्षणाचे काय ? असे म्हणून जबाबदारीची जाणीव लक्ष्मीवहिनी यांनी अण्णांना करून दिली होती. जागतिक दृष्टिकोनातून विचार करता अण्णा व वहिनी ही परंपरेकडून आधुनिकतेकडे प्रवास करणारी व्यक्तिमत्वे आहेत. रयत माऊली या आधुनिकतेच्या जवळ गेलेल्या होत्या, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी केले.
ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीवहिनी यांच्या 93 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते. यावेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी प्राचार्य आर. डी. गायकवाड. ऍड. दिलावर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. प्रकाश पवार पुढे म्हणाले, अण्णा देणगी गोळा करण्यासाठी बाहेर जात अशा वेळेस सर्व वसतिगृहाची जबाबदारी लक्ष्मीवहिनी घेत असत. स्वावलंबनाचे तत्व हे लक्ष्मीवहिनी यांनी स्वीकारलेले होते. जॉन ड्युई यांनी शिक्षणातील विविध प्रयोग केले त्या प्रकारचे प्रयोग साताऱ्यामध्ये वसतिगृहामध्ये कर्मवीर व सौ. लक्ष्मीवहिनी यांनी अगोदरच सुरू केलेले दिसून येते. निसर्गाशी संवादी राहण्याचे व संवेदनशीलतेचे शिक्षण जॉन ड्युई यांनी महत्वाचे मानले होते. तेच शिक्षण तर कर्मवीर आणि वहिनींच्या रयत शिक्षण संस्थेत मिळत होते. आज जॉन ड्युई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याचा तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, सौ. लक्ष्मीवहिनी यांचे योगदान अण्णांपेक्षा कितीतरी मोठे आहे. रयतवर अण्णांपेक्षा वहिनींचे ऋण अधिक राहिले. वहिनी व अण्णा यांचा वारसा जर जपायचा असेल तर त्याग समर्पणाची भावना यांची जपवणूक करावीच लागेल. संस्थेचे सचिव प्रि. डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी प्रा. संभाजी पाटील व सहकाऱ्यांनी गीते सादर केली. वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत गुजरे यांनी अहवाल वाचन केले.
याप्रसंगी रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा येथील पालक, विद्यार्थी व सेवकांनी स्नेहसंमेलनात 42 हजार 870 रुपये खर्च बचत करून अनाथ व आर्थिक दुर्बल वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना सौ. लक्ष्मीवहिनी यांच्या नावे फंड सुरू करून देणगी दिली. संस्थेचे सहसचिव प्रि. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, प्रा. संभाजी पाटील, प्रि. डॉ. भारत जाधव, ओ. एस. डी. व संस्थेचे समन्वयक प्राचार्य शहाजी डोंगरे, देणगीदार, जनरल बॉडी सदस्य व सर्व रयतच्या शाखांतील रयत सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.