Naxalites – छत्तीसगड मधील उर्वरीत नक्षलवाद्यांवर शेवटचा घाव घालून त्यांचा खात्मा करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 3,000 हून अधिक जवानांचा समावेश असलेल्या बीएसएफच्या तीन बटालियन ओडिशाहून छत्तीसगडला नेल्या जातील आणि तितक्याच संख्येने आयटीबीपीच्या तुकड्या अबूझमद या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागाकडे धाडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या नक्षलवादी विरोधी धोरणातून ही कृती करण्यात येत आहे.
“बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपी सारख्या निमलष्करी दलांमार्फत नक्षलवाद्यांच्या विरोधात हा शेवटचा घाव घातला जात आहे. आम्ही देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे,असे गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडमधील हजारीबाग येथे १ डिसेंबर रोजी बीएसएफच्या जवानांना संबोधित करताना म्हटले होते.
सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सहा नवीन सीओबी किंवा कंपनी तळ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आणि सुरुवातीला ओडिशाच्या मलकानगिरी येथील एका बटालियनला छत्तीसगडकडे हलवले जात आहे. बीएसएफच्या एका बटालियनमध्ये १००० हून अधिक जवान असतात.
छत्तीसगडमधील नारायणपूर, राजनांदगाव आणि कोंडागाव जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे आठ बटालियन असलेल्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलाला अबुझमदच्या मुख्य भागात लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले आहे.
अबुझमद हे नारायणपूर जिल्ह्यातील सुमारे ४००० चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे आणि हा परिसर सशस्त्र नक्षलवाद्यांचा गड मानला जातो.या भागात आता केंद्रीय दलांचे कायम स्वरूपी तळ उभारले जात आहेत.
माओवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांच्या प्रभावाखालील प्रदेश ताब्यात घेण्यासाठी सुरक्षा दल आपली नवीन ताकद आणि पायाभूत सुविधा येथे तयार करत आहेत जेणेकरून राज्य सरकारकडून विकास कामे सुरू करता येतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.