SA vs IND : टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. अर्शदीप आणि आवेश खानसमोर यजमान संघाच्या फलंदाजांना यश मिळाले नाही आणि अवघ्या 116 धावा करून संपूर्ण संघ गडगडला. नवोदित साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 117 धावांचे लक्ष्य 16.4 षटकांत 2 गडी गमावून सहज गाठले.
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड अवघ्या ५ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांनी मैदानावर तळ ठोकला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. अय्यरने 45 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान अय्यरने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. तर, साई सुदर्शन 55 धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला खाते न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी रॅसी व्हॅन डेर ड्युसेनही शून्यावर परतले. 28 धावा करून टोनी डीजोर्जी अर्शदीप सिंगचा तिसरा बळी ठरला. कर्णधार अॅडम मार्करामही फलंदाजीत काही खास चमक दाखवू शकला नाही आणि केवळ 12 धावा करून बाद झाला.
हेन्रिक क्लासेन देखील केवळ 6 धावा करून बाद झाला. डेव्हिड मिलरला अवेश खानने 2 धावांवर बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.३ षटकात अवघ्या ११६ धावा करत गारद झाला.
अर्शदीप-आवेशची दमदार कामगिरी
गोलंदाजीत भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी जबरदस्त बॉलिंग केली. अर्शदीपने शानदार गोलंदाजी करत पाच बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याचवेळी आवेशनेही घातक गोलंदाजी करत अवघ्या 27 धावांत 4 बळी घेतले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.