शिरूर – शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून शेतकऱ्यांकडून माल घेणारा व्यापारी मात्र भाजीपाला व उन्हाळी फळे विक्रीतून गब्बर होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे.
त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना काही ठराविक वेळ दिला आहे. शिरूर बाजार समितीनेही “सोशल डिस्टन्सिंग’ करत भाजीपाला मार्केट बंद केले आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांनी उठवला दिसत आहे.
लॉकडाऊनच्या कचाट्यातून शेतकरीही सुटलेला नाही. शिरूर तालुक्यातील शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिरूरमध्ये भाजीपाला येतो. हा भाजीपाला मुंबईपर्यंत काही व्यापारी घेऊन जातात; परंतु जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्याने तालुकांतर्गत भाजीपाल्याची विक्री होत आहे.
रोज सकाळी शिरूर तालुक्यातील गोलेगाव, निमोने, करडे, न्हावरे, सरदवाडी, रामलिंग, अण्णापूर, मलढण, कवठे, टाकळी हाजी, आमदाबादसह श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील भाजीपाला शिरूर शहरात विक्रीसाठी आणला जातो; परंतु शिरूर बाजार समितीने बाजार बंद केला आहे. शेतकऱ्याला मातीमोल भावाने आपला माल व्यापाऱ्याला द्यावा लागत आहे.
व्यापारी कवडीमोल भावाने शेतकऱ्याचा माल घेत असून तो चढ्या भावाने शहरात विकत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळे सध्या उत्पादित होत आहे.
मात्र, या मालाला गिऱ्हाईकच नसल्यामुळे हा माल शेतात सोडून जात आहे. शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात चिक्कू, टोमॅटो, काकडी, टरबूज, कलिंगड, मिरची हिरव्या पालेभाज्या रोज निघत आहेत; परंतु हा भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी सरकारने नियोजन केले नसल्याने भाजीपाला शेतातच सडत आहे.
– नितीन थोरात, शेतकरी, आमदाबाद.