अकोले -केंद्राच्या मोफत धान्य वितरण योजनेत गडबड-घोटाळा सुरू आहे, असा आरोप ग्राहक पंचायतीच्या अकोले शाखेच्यावतीने करण्यात आला आहे. केंद्र सरकारने माणसी पाच किलो तांदूळ मोफत वितरित केला आहे. मात्र यामध्ये अकोले तालुक्यात गडबड घोटाळा झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. बऱ्याच स्वस्त धान्य दुकानदारांनी माणसी पाच किलो ऐवजी मनमानी पद्धतीने कमी तांदूळ देऊन केंद्राच्या योजनेलाच बदनाम केले असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे.
ग्राहक पंचायतीने याबाबत पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्याच्या प्रति अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्राहक पंचायतचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय लाड व जिल्हा पदाधिकारी आदीना पाठविल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, करोना महामारीमुळे देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हाताला काम नाही. गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून केंद्र शासनाने एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांसाठी प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ शिधापत्रिकेवर मोफत वितरित करण्याचे राज्याला आदेश दिले आहेत. मात्र अकोले तालुक्यात रेशन दुकानदारांनी मनमानी सुरू केली आहे.
प्रतिमाणसी पाच किलो ऐवजी तीन, चार व साडेचार किलो तांदूळ वितरित करून गरिबांची बोळवण केली जात आहे. ही बाब तहसीलदार कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तहसीलदार कांबळे यांनी शासकीय पातळीवर असा कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ वितरित करण्याचेच आदेश दिलेले आहेत. धान्य वितरकांपैकी काहींना विचारले असता, ते म्हणाले की, ग्राहकांसाठी मोफत धान्य आले, तरी ते आम्ही विना मोबदला का वितरित करायचे? धान्याचे कट्टे सरासरी 2-4 किलो कमी येतात. ती सरासरी मेंटेन करण्यासाठी आम्हाला असे करावे लागते, असे सांगितले. वितरकांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी.
दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अकोले शाखाध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव दत्ता रत्नपारखी, सदस्य भाऊसाहेब वाळुंज, रमेश राक्षे, संजय वाकचौरे, ऍड. दीपक शेटे, राम भांगरे, महेश नवले, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, राम रुद्रे, कैलास तळेकर, सुदाम मंडलिक, नगरसेवक प्रमोद मंडलिक, मच्छिंद्र चौधरी, दत्ता ताजणे, जालिंदर बोडके, राजेंद्र लहामगे आदींनी केली आहे.
शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा
लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्या बंद आहेत. तरीही भारनियमन शेतकऱ्यांच्या नशिबी आहेच. किमान लॉकडाऊनच्या काळात तरी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणीही ग्राहक पंचायतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे केली आहे.