– अमित डोंगरे
तोशिका पाटील या केवळ 8 वर्षांच्या मुलीने अनेकांना आश्चर्याचा धक्का देत अवघ्या साडेपंधरा तासांत तब्बल सात किल्ले सर करण्याची अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर आता तोशिकाला एव्हरेस्ट खुणावत आहे. तिच्या या कतृत्वाला बळ मिळाले व पाठिंबाही मिळाला तर येत्या काळात ती एव्हरेस्टवीर म्हणून नावारूपाला येईल.
घरच्यांचा पाठिंबा, योग्य मार्गदर्शन व जीद्दीची जोड मिळाली तर एक सर्वसामान्य कुटुंबातील चिमुरडी लेकही किती मोठी भरारी घेऊ शकते याचाच प्रत्यय तोशिकाने सिद्ध करून दाखवला आहे. तोशिकाने साडेपंधरा तासांत 7 किल्ले सर केले आहे. तिने 1 मार्चला ही मोहीम फत्ते केली. त्या दिवशी पहाटे 5.30 ते रात्री 9 यादरम्यान ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या वेळेत तिने बकेटलिस्ट ऍडव्हेंचरचे संचालक ऋतुराज अगवणे व राष्ट्रपती पुरस्कारविजेते सागरी जलतरणपटू रोहन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकोणा, तुंग, कोरीगड, लोहगड, विसापूर, मनोरंजन व श्रीवर्धन हे 7 किल्ले सर केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवाडी गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तोशिकाने आपल्या पालकांबरोबरच आपल्या राज्याचीही शान उंचावली आहे. तिचे आई-वडील नोकरदार आहेत. त्यांच्याबरोबर किंवा अन्य नातेवाईकांसह तोशिका सातत्याने वेळ मिळेल तेव्हा गड-किल्ल्यांवर फिरायला जात असे. यातूनच तिला या मोहिमेची कल्पना सुचली. तसेच तिला ट्रेकिंगचीही आवड निर्माण झाली.
तिच्यासह विविध किल्ल्यांवर चढाई करताना तिच्या सहकाऱ्यांपेक्षा तोशिका अत्यंत सहजतेने व चपळाईने चढाई करायची. याच वर्षी 31 जानेवारीला तोशिका व तिची 3 वर्षांची लहान बहीण फाल्गुनी यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसूबाई शिखर सर केले. तोशिकाचा हाच उत्साह पाहून तिचे नातेवाईक असलेल्या रोहन मोरे यांनी एका दिवसांत 5 किल्ले सर करण्याची कल्पना मांडली. तोशिकाची तयारी झाली व तिच्या आई-वडिलांनीही तिला पाठिंबा दिला.
ठरल्याप्रमाणे 1 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तिकोणा किल्ल्यापासून मोहिमेला प्रारंभ झाला. सुमारे 1 तास 25 मिनिटांत हा किल्ला तिने सर केला. त्यानंतर तुंग (1 तास 25 मिनिटे), कोरीगड (50 मिनिटे), लोहगड (1 तास) व विसापूर (1 तास 5 मिनिटे) हे 5 किल्ले सर करत तोशिकाने एका अफलातून कामगिरीच्या दिशेने वाटचाल केली. पाच किल्ले सर करूनही तिचा उत्साह जराही कमी झालेला नव्हता. आपण आणखी काही किल्ल्यांवर मोहीम करू असे सांगत तोशिकाने सहकाऱ्यांचाही उत्साह वाढवला व राजमाची जवळील मनोरंजन व श्रीवर्धन या किल्ल्यांवरही यशस्वी चढाई केली. रात्री 7.45 ते 9 अशा अवघ्या सव्वा तासात तोशिकाने दोन्ही किल्ले सर केले.
ही मोहीम फत्ते झाल्यानंतर तोशिकाने जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची इच्छाच नव्हे तर स्वप्नही असल्याचे मत व्यक्त केले. एकाच मोहिमेत तब्बल सात किल्ले सर करण्याचे तोशिकाचे वय नाही मात्र, तरीही तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली. गिर्यारोहणात महाराष्ट्र सातत्याने यशस्वी होत आहे. त्यात निष्णात गिर्यारोहकही महाराष्ट्राने देशाला दिले आहेत.
तोशिकाही आता याच गिर्यारोहकांच्या पंक्तित स्थानापन्न झाली आहे. येत्या काळात तिने एव्हरेस्ट सर केले तर अनेक वर्षांनंतर ही कामगिरी फत्ते करणारी ती दहा वर्षांच्या आतील पहिलीच मुलगीही ठरेल. तिच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क आहे. तिची इच्छाशक्ती अफाट असून त्यामुळेच ती न थकता सलग विविध मोहिमा फत्ते करत आहे. तिला आर्थिक सहकार्य, योग्य व तांत्रिक पाठबळ व पाठिंबा लाभला तर येत्या काही वर्षांत ती एव्हरेस्टवीर म्हणून नावारूपाला आलेली असेल.
ऋतूराज आगवणे व रोहन मोरे यांच्यासह येत्या काळात तिला एव्हरेस्ट मोहिमेसाठी इतर अनेक व्यक्तींचे तसेच विविध स्तरावरचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. अशा कठीण मोहिमा करणारे अनेक आहेत, त्यात यश मिळवणारे मात्र, हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कमी संख्येने आहेत. त्यामुळे तोशिकाच्या नावावर एव्हरेस्टवीर अशी बिरुदावली लागण्यासाठी केवळ इच्छाशक्ती किंवा जिद्द असून चालत नाही तर त्यासाठी विविध संस्था व संघटनांनीही पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची ही कन्या एव्हरेस्टला साद घालत आहे. तिच्या या स्वप्नांना सहकार्याचे पंख मिळाले तर यशाची झेप घेणे कठीण नाही.